नांदेड, (प्रतिनिधी) :- राज्यामध्ये मागील 3 वर्षात खरीप हंगामात ४४ लाख मे.टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी (म्युरेट ऑफ पोटॅश), संयुक्त खते व एसएसपी (सिंगल सुपर फॉस्फेट) या खतांचा वापर केला जातो.
महाराष्ट्र राज्य हे मृद परिक्षण व जमिन आरोग्य पत्रिकांचे आधारे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रणाली वापराकरीता अग्रेसर आहे. राज्यामध्ये लवकरच पेरणीला सुरुवात होणार असून डिएपी खताची शेतक-यांकडून जास्त मागणी होणार आहे. डिएपी (Di-Ammonium Phosphate) खता मध्ये १८ टक्के नत्र तर ४६ टक्के स्फुरद ही अन्नद्रव्य आहेत.
राज्यामध्ये डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यामुळे पर्यायी खत वापरणे गरजेचे आहे. स्फुरद युक्त खतामध्ये डीएपी खतानंतर एसएसपी (Single Super Phosphate) या खताची सर्वाधिक मागणी आहे. एसएसपी खत हे देशातंर्गत तयार होत असून यामध्ये स्फुरद-16 टक्के सह सल्फर व इतर सूक्ष्म अन्नद्रव्ये आढळून येतात. सल्फर अन्नद्रव्यामूळे तेलबिया पिकांमध्ये एसएसपी खताचा वापर फायदेशीर ठरणार आहे. डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व एसएसपी तीन गोणी खतांचा वापर डिएपीस चांगला पर्याय आहे.
एसएसपी बरोबरच संयुक्त खते जसे की एनपीके-10:26:26, एनपीके-20:20:0:13, एनपीके-12:32:16, युरिया एसएसपी कॉम्पलेक्स व एनपीके-15:15:15 या खतांच्या वापरामुळे नत्र व स्फुरद बरोबरच पालाश हे अन्नद्रव्य सुध्दा पिकांना उपलब्ध होते. त्यामुळे या संयुक्त खतांचा वापर केल्यास पिकांसाठी पोषक ठरतो.
त्याचबरोबर टिएसपी (Tripple Super Phosphate) या खतामध्ये 46 टक्के स्फुरद अन्नद्रव्याची मात्रा असुन डिएपी खताच्या एका गोणी ऐवजी युरिया अर्धी गोणी व टिएसपी एक गोणी खतांचा वापर केल्यास तो देखिल डिएपी खतास उत्तम पर्याय आहे.
चालू खरीप हंगामामध्ये शेतक-यांनी केवळ डिएपी खतावरच अवलंबून न राहता बाजार मध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून राज्यातील सर्व शेतकरी बांधवाना करण्यात येत आहे.

