जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यात स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू मोहिमेचे आयोजन लोकसहभागातून स्वच्छता व पर्यावरण संरक्षणाला चालना

नांदेड (प्रतिनिधी) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये दि. १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू मोहिम राबविण्यात येणार असून ग्रामस्थांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेद्वारे ग्रामीण भागात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, हवामान बदलाबाबत जनजागृती तसेच पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
मोहिमेअंतर्गत प्लास्टिक कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे, सांडपाण्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, कचऱ्यापासून खत व उपयुक्त वस्तू निर्मिती, ओला व सुका कचरा विलगीकरण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा प्रसार याबाबत व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत स्तरावर स्वच्छता अभियान, श्रमदान, स्वच्छता शपथ, वृक्षारोपण, जनजागृती रॅली, शाळा व अंगणवाडी स्तरावरील विविध उपक्रम तसेच विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
दि. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियमांबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार असून गावपातळीवर कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त परिसर निर्मिती, सांडपाणी व्यवस्थापन तसेच सामुदायिक स्वच्छता सुविधांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मोहिमेचा समारोप दि. ५ जून रोजी विशेष ग्रामसभेद्वारे करण्यात येणार आहे.
या मोहिमेत सर्व गट विकास अधिकारी, ग्रामपंचायती, अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, महिला बचत गट तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड तसेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *