नांदेड जिल्ह्यात १६ मेपासून जनगणनेला प्रत्यक्ष सुरुवात नागरिकांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी

नांदेड, (प्रतिनिधी): नांदेड जिल्ह्यात जनगणना २०२७ अंतर्गत घरयादी व घरगणनेच्या पहिल्या टप्प्याला १६ मेपासून प्रत्यक्ष सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरी प्रगणक आणि पर्यवेक्षक भेट देणार असून नागरिकांनी त्यांना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी शक्यतो सकाळी व सायंकाळी जनगणनेची कामे पूर्ण करावीत, जेणेकरून उन्हाचा त्रास होणार नाही, अशी सूचनाही त्यांनी दिली.

तसेच, घरी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांशी ‘अतिथी देवो भवः’ या भावनेतून वागून त्यांना पाण्याची विचारपूस करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी नागरिकांना केले. उद्यापासून सुरू होणाऱ्या जनगणनेसाठी त्यांनी सर्व प्रगणक व पर्यवेक्षकांना शुभेच्छा दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी किरण अंबेकर, सहायक संचालक जनगणना कार्यालय मुंबई बी. प्रसाद, जिल्हा जनगणना समन्वय अधिकारी नेहाल धुरंधरे आणि तहसीलदार (महसूल) तथा जिल्हा जनगणना कक्ष प्रमुख विपिन पाटील यांनीही ग्रामीण भागात काम करणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांनी उन्हापासून संरक्षणाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *