
नांदेड (प्रतिनीधी) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबतच्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठीच्या प्रवेशिका मागविण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेशिका मागविण्याचा अंतिम दिनांक १५ मार्च, २०२६ असा होता; तथापि, आता दि. ३१ मार्च, २०२६ पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक १ जानेवारी, २०२५ ते ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन / छायाचित्रे / वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत.
